शहरं

सोकी बंदर नावाचे छोटे बेट आहे सिंधू नदीच्या मुखाजवळ. आपल्या मुंबईसारखे. काही दशकांपूर्वी दृष्ट लागेल असे समृद्ध…तलम कापड आणि मग्रूर व्यापारी यांनी भरलेले. हळूहळू समुद्र आत आला आणि सिंधू मागे पडत गेली. सोकी बंदर आज एक वठलेले, मिठाने भरलेले गाव आहे… इतके गरीब की आरशासारखे लख्ख. कचरा नाहीच.

गोमती नदी, अंह, द्वारकेची गोमती, गंगेची उपनदी नाही, अरेबिअन समुद्रात आत आत शिरत असे. Archaeological evidence असे सांगतो की १४०० BC पासून इथे अनेक समृद्ध शहरे वसली. त्यांनी समुद्राला रोखून धरायचे खूप प्रयत्न केले. भिंती बांधल्या, गोमतीला बांधून घालायचा प्रयास केला… पण प्रत्येक द्वारका बुडलीच.

आज देखील गोमती नदीचे १.५ किमी पात्र समुद्राच्या आत सापडते. आणखी काय काय सापडते तिथे माहितीये….दगडी भिंती, दगडी anchor, मोती, हरप्पन काळातील Lustrous Red Ware Pottery. अनेक संस्कृतींचे अवशेष…पण आपण अडकलोय फक्त कृष्णाच्या गोष्टीत..

Related image
समुद्रातील दगडी Anchor Photo: National Institute of Oceanography

तशीच Cleopatra आणि Julius Caeser यांची Alexandria…Cleopatraचा अख्खा राजवाडा गिळला पाण्याने…आपण सगळे विसरलो होतो त्याला, पण चिरतरुण Cleopatraच्या गोष्टी संपल्या नाहीत. काही वर्षापूर्वी समुद्रात उत्खनन झाले आणि काही लाजणारे, भग्न अवशेष दोरखंडांनी हवेत आले. (त्यांना आतच बरे वाटत असेल कदाचित)

आणि नाईल नदीच्या मुखाशी, delta मधे होते वैभवशाली Heracleion..Egypt चे सर्वात संपन्न बंदर… पण तुला Heracleion ची खरी गम्मत माहितीये..इथे Helen of Troy आणि Paris भेटले होते. तेच दोघे ज्यांना भेटता क्षणी कळले की आपल्या भेटीने मंथन होणार..

Image result for Heracleion
Heracleion चे अवशेष   फोटो: Atlasobscura.com

या शहराचे नाव पडले Heracles या ग्रीक देवावरून. कोण होता हा माहितीये? Alcmene आणि देवांचा देव Zeus यांचा मुलगा. यांची गोष्ट अगदी तुझ्या अहिल्ये सारखी… Zeus देखील एकदा Alcmene च्या नवऱ्याचे: Amphitryon चे रूप घेऊन आला. पण त्यांच्या मुलाला ग्रीसने देव केले… ना Alcmene अहिल्येसारखी शिळा झाली, ना Zeus शापित झाला. असो.

तर हे Heracleion 1200 वर्षा पूर्वी Mediterranean समुद्रात बुडाले. नाईल कमी पडली. ज्याला बंदरांचा राजा, इजिप्तचे अविभाज्य अंग वगैरे म्हटले होते त्याला लोक पुरते विसरून गेले! राहिले काय तर Helen of Troy आणि Paris च्या गोष्टी.

शहरे चिरंतन नसतात. गोष्टी चिरंतन असतात. शहरे विसरली जातात…कितीही संपन्न, श्रीमंत, सुंदर असली तरीही. वेड्यांच्या गोष्टी मागे राहतात. त्याच गोष्टी कधी मग या झोपलेल्या शहरांना नदीच्या, समुद्राच्या कुशीतून उठवतात.

शहरे वृद्ध, थकलेली: गोष्टी तरुण, सदा नव्या. प्रत्येक सांगणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे वय स्वतःच ढापणाऱ्या!

म्हणून मला ती बाग खूप आवडते. तिथे लगबग चालणारे लोक, व्यायाम करणारी गमतीशीर माणसे, भंकस करणारे तरुण तरुणी, नारळाची झाडे, जवळच असणारे mangroves, त्या शेजारची बिट्टी नदी, तिच्या पलीकडचा समुद्र.. हे सगळेच. उद्या, परवा, हजार वर्षानंतर समुद्राने बागेला अगदी गिळले तरी हरकत नाही. बाग आणि तिच्या गोष्टी माझ्यासाठी चिरंतन आहेत.

बाकी नदी आणि समुद्राची भरती ओहोटी सुरूच राहणार की.

~परिणीता