कोणाच्या भाग्यरेखा कोणाला कुठे घेऊन जातील.. you know what…निसर्गात बरोबर-चूक काही नसते. फक्त असते…त्याला बरोबर-चूक हा aluminium-चांदी वर्ख आपण चढवतो. लखलख-चमचम आवडते 🙂
यही देखो.. नदीने समुद्रात गेलेच पाहिजे. त्यात तिची परिपूर्ती. तसं नाही झालं तर चक्रच थांबेल. एक छोटी नदी मोठ्या समुद्राला नाही मिळाली म्हणजे एक लांब साखळी तुटली की खळकन…हजारो वर्षे एकमेकात विश्वासाने गुंफलेले हात निसटले की गर्दीत..
ओके, yes. I get it. I get it so well.
पण अशाही काही आहेत ज्या नाहीच मिळत समुद्राला.. Okavango नदी…Angola, Namibia आणि Botswana तून वाहणारी.. संपन्न …१५०० किमी पेक्षा लांब..आणि माहितीये ती बोत्स्वानात पोचल्यावर नुसतीच धावधाव करून पसरते..give up मारते. पूर्वी, म्हणजे लिटरली हजारो वर्षापूर्वी तिथे एक सरोवर होते, मग ते आटले पण तरी ही बया तिच्या जुन्या डगरीने तिथेच जाऊन पोहोचते आणि मग सगळ्या पाण्याची वाफ होते…
महत्वाचा तो तिचा प्रवास.. त्याचे असणे नव्हेच. ती नवी-जुनी, ती कधी कुणी..

माझी मैत्रीण राहते इथे..फेमो..सांगते कधी रात्री झोपाताना सगळे कोरडे असते आणि सकाळी जाग येते ती direct नदीत! तिच्या लॉग-केबिनमधून बाहेर आले की समोर हिप्पो 🙂या सगळ्या unpredictability मधे सौंदर्य आहे बॉस. हार्टब्रेकिंग सौंदर्य. ती, तेव्हा तशी..ती बहराच्या बाहूंची..
अशा खूप आहेत जगभर, ज्यांचा delta नाहीच मिळत समुद्राला. तू सांगितलेस, समुद्राला नाही मिळाली तर नदी “धराशायी” होते… किती सुंदर शब्द आहे, धराशायी…पृथ्वीवर निजणारी..
आफ्रिकेतली सगळ्यात लांब नदी नायगर..हिची बहिण बनी..ती यडी सहारा वाळवंटाकडे अगदी आपली वाट वाकडी करून जाते… आणि बनवते “मसिना”!.. वाळवंटाजवळ एक हिरवा, पूर येणारा, भात वाढवणारा आणि मासेमारी करणारा प्रदेश! बनी नाही मिळत समुद्राला.
आपल्याकडे तर रेलचेल आहे ना. I love Rann of Kutch. त्याची ती खारी, चंदेरी माती, तो खारा निष्ठुर वारा..आणि that promise of a river! एकटी फिरले होते खूप.. इथे पूर्वी अरबी समुद्रच होता…खूप पावसाळ्यात आजदेखील सगळं वाळवंट पाण्याने भरून जातं.

इथे एक नदी येते लगबगीने, charting her old remembered ways to the sea..पण मग तिची गोची होते… समुद्र कुठेय? शोधताना तिचे पाणी अनेक दिशांनी धावते आणि पसरते इथेच.. ही लुणी नदी..कच्छच्या रणात विरघळते..
तशीच रुपेन, सरस्वती आणि बनास..या लिटल रणमध्ये अदृश्य होतात…प्रत्येकीची आपली कथा. प्रत्येक झंजावाती पूर घेऊन येते..वाळवंट फुलतं नुसतं..स्फोट होतो सृजनाचा..इतका की जीव बिचकतात जरा, मग ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये येतात लाखो-लाखो Flamingos आणि Pelicans आणि Painted Storks ..सगळं वाळवंट गुलाबाचं रान करून टाकतात..त्यात कोल्हे हिंडतात आणि देखणी गाढवं आणि मोर…हा वेगळाच उत्सव…
सगळे wild misfits..वेडे पीर..भटके जिप्सी..यांची भाषा यांचीच.. समुद्रात न जाणारी नदी काय, पूर येणारं वाळवंट काय, देखणी गाढवे काय, मीठाचे शुभ्र डोंगर बनवणारी माणसे काय..आधांतरी तरंगणारे भूत-दिवे काय!
आधी आपली सिंधुपण सामील व्हायची या सगळ्या गोंधळात..तिची उपनदी कोरी या भागाला भिजवायची, मग १८००s मध्ये एक भूकंप झाला आणि सगळंच बदललं..
असो. सांगायचं काय होत ते विसरलेच…. खरं तर सांगायचं फारसं काही नसतं, एक-दोन तारा जोडायच्या असतात कधी, कधी चुकार प्रतिबिंब बघायचं असतं, चाफ्याचं एखादं फुल उचलून केसात खोचायचं असतं, ओंजळभर हसायचं, पापणीभर पाणी साठवायचं असतं, एखादी अर्थहीन-absurd गोष्ट सांगायची-ऐकायची असते. मुद्दा असा नसतोच बहुतेक… पुढे खूप दिवस पुरतं हे..पण कशाला हे सगळं? असो.
धराशायी होणं वाईट नाहीये.. जीव तोडून चाललेल्या प्रत्येक वाटेला पुढे समुद्र लागेलच असं काही नाही. कधी सरोवर लागेल, कधी माळरान, कधी अख्खं वाळवंट..But thats ok. वाळवंटात देखील पूर येतात. नदी अगदी हवेत विरली तरी परत बरसतेच.
आपला समुद्र आत असतो कधी. शांत रात्री गाज ऐकू येते बघ?